Tuesday, August 15, 2017

मधुकोष बालगोकुलम - शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा

मधुकोष बालगोकुलम - शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा
नमस्कार,
   पर्यावरण विषय घेऊन मागच्या वर्षीपासून मधुकोष बालगोकुलम शाडू मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा सोसायटीमध्ये घेते, जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती आणि विविध केमिकल्स चे रंग आणि त्यापासून होणारे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. शिवाय सर्व मुलांमध्ये कलाकुसर जोपासण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
या वर्षी केवळ मधुकोष सोसायटी साठी हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता शेजारील सुंदर संस्कृती मधील मुलांना देखील बोलावण्यात आले.
यंदाच्या वर्षी घेतलेल्या कार्यशाळेत ६५ मुलेमुली सहभागी झाले, भरपूर धमाल करत सर्व मुलांनी, त्याच सोबत सहभागी झालेल्या पालकांनी आणि ६ शिक्षकांनी या कार्यशाळेचा मनसोक्त आनंद घेतला. शिवाय मुलांनी पण पालकांना गणपती घरी घेऊन जाऊन अनेक धक्के दिले :)

कार्यशाळेची क्षणचित्रे येथे बघा





Friday, June 16, 2017

रक्तदान शिबीर, दिनांक १४ मे २०१७

धुकोष आयटी मिलनाचे दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील रक्तदान शिबीर उत्साहात दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजित करण्यात आले, त्याचा छोटेखानी वृत्तांक - 


नमस्कार,
सर्व मधुकोष रहिवाश्यांचे अभिनंदन,💐💐💐💐, आज  जनकल्याण रक्तपेढी तर्फे मधुकोष मधील रक्तदानाचे सलग तिसरे वर्ष होते.सोसायटी मधील एकूण - ३५ रहिवाशी नागरिकांनी रक्तदान केले. १४ - नागरिकांना रक्तदान हिमोग्लोबिन मुळें करता आले नाही, त्यात १० महिलांचा समावेश.

कार्यक्रम:
सर्वप्रथम सकाळी तीनही फेज चे प्रतिनिधींनी स्वरूपात डाॅ उमेश कुलकर्णी,  डाॅ डोंगरे काका, डाॅ हिमांशु डोंगरे व डाॅ श्री व सौ स्वानंद घोलप यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भारतमाता पुजन करून रक्तदानाची सुरूवात झाली.सर्व रक्तदात्यांना रक्तदाना नंतर पुर्णम ईको व्हिजन महिला बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्या भेट स्वरूपात वितरीत करण्यात आल्या आणि या उपक्रमाची सर्वांनीच प्रशंसा केली, प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर कमी व्हावा हा ह्या मागचा उद्ददेश.
तसेच मधुकोष मधे काम करणारऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळ्याचे पाणपोईचे उदघाटन सर्व फेज मधील पदाधिकाऱ्यांचा हस्ते  करण्यात आले.

रक्तदान शिबीर आयोजन करण्याची अनुमती व सहभागा बद्द्ल सर्व फेज मधील पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च आभार व धन्यवाद. 

विशेष:
या रक्तदान शिबिरात मधुकोष मधील रहिवासी श्री विक्रम ईनामदार यांनी ५० वेळेस रक्तदान केले आहे व श्री सुबोध पाठक यांनी ३७ वेळेस रक्तदान केले आहे  🙏🏻

टीप: 
    ह्या वेळेस महिलांचा रक्तदानात सहभाग व प्रतिसाद चांगलांच होता. पुढील वर्षी महिला रक्तदात्या कश्या  वाढतील ह्याकडे पाहुयात. 

धन्यवाद!

Monday, April 3, 2017

प्लास्टिक व ई-कचरा संकलन अभियानातील पुढचे पाऊल...

सब समाज को लिए साथ में, आगे बढते जाना हैं ||
प्लास्टिक व ई-कचरा संकलन अभियानातील पुढचे पाऊल म्हणजे आज (दि. २ एप्रिल २०१७) रोजी झालेला प्लास्टिक कचरा, ई-कचरा व जुने परंतु वापरण्याजोगे कपडे यांचे परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त संकलन. मागील वर्षी (२०१६ साली) १८ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान सामाजिक रक्षाबंधन या कार्यक्रमाचे माध्यमातून प्लास्टिक व इलेकट्रॉनिक कचऱ्याचे दुष्परिणाम आणि यासाठी करावे लागणारे योग्य रीतीने विघटन आदी विषयांसाठी व्यापक समाजप्रबोधन संपूर्ण पुणे महानगरात करण्यात आले होते, २८ ऑगस्ट रोजी केलेल्या ४ तासाच्या संकलनातून संपूर्ण पुण्यातून ४१ टन कचरा गोळा करण्यात आला, त्या अभियानात आपल्या परिसरातून साधारण १८०-१९० किलो कचरा गोळा करण्यात आला होता.


तेव्हापासूनच अश्या स्वरूपाचे अभियान केवळ नैमित्तिक अभियान न राहता एक स्थायी स्वरूपाचा आणि संपूर्ण नागरिकांच्या पुढाकाराने चालणारा एक उपक्रम असावा असाच सर्वांचा आग्रह राहिला. प्रशासनावर विसंबून न राहता समाजाने समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, भावी पिढींना तसाच निसर्ग अनुभवावयास मिळावा इत्यादी उद्दात हेतूंनी अनेकांच्या मनात याबद्दल विचारांची उलथापालथ चालली होती, यात साथ मिळाली ती मिळालेल्या कचऱ्याचे वैज्ञानिक दृष्टीने योग्य विघटन करण्यात पारंगत असलेल्या संस्थांची, यात प्लास्टिक विघटनासाठी रुद्र एन्व्हायर्नमेन्ट, ई-कचऱ्याच्या विघटनासाठी पुर्णम इको व्हिजन आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान. 

अभियान स्वरूपात राबवल्या गेलेल्या या सामाजिक रक्षाबंधन  कार्यक्रमाने आजच्या कार्यक्रमाची बीजे रोवली गेली, याचीच दुसरी व्यापक प्रमाणातली साखळी मागे आपल्या पर्यंत आलीच होती ती म्हणजे २०१७ जानेवारी मध्ये. परिसरातील ९ सोसायट्यांमधील २३ पदाधिकारी,  ३ पर्यावरण विषयातील तज्ज्ञ, ९ अथक काम करणारे स्वयंसेवक आणि स्वानंद चे १० स्वयंसेवक अश्या नागरिकांच्या सहकार्याने केलेल्या संकलनात एकूण ३०० किलो कचरा गोळा करण्यात आला होता. आणि याचेच कायम स्वरूपी केंद्र म्हणून राजयोग सोसायटी रस्त्यावरील श्री गणेश कपडे धुलाई केंद्रावर दर रविवारी सकाळी १० ते १२ असे ठरवण्यात आले.

याच अभियानातील पुढची कडी आज जोडली आपल्या परिसरातील (राजयोग, मियामी, अर्काडिया, वसंत विहार, क्रॉस ओव्हर, सिरीन काऊंटी, मधुकोष, सुंदर संस्कृती) अनेक सोसायटींनी. नागरिकांची सोय म्हणून यावेळेस सर्व सोसायटींनी असे ठरवले कि दर महिन्याला अश्या प्रकारचा उपक्रम सोसायटीने आपल्या आपल्या ठिकाणी घ्यावा, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी नागरिकांना आवाहन करून कचऱ्याचे संकलन करावयास सांगावे आणि संस्थांमार्फत पुढील योजना करण्यात येईल. आजच्या अभियानात २२ जणांचा सहभाग होता, यात विविध सोसायटीमधील पदाधिकारी, स्वयंसेवक आणि स्वानंद चे स्वयंसेवक उपस्थित होते, परिसरातील जवळपास ८२ कुटुंबांनी या संकलनात मदत केली हे विशेष. संकलनात ६५०-७०० किलो जुने कपडे, ५०-६० केले प्लास्टिक तसेच ६०-७० केले ई-कचरा गोळा करण्यात आला.  या संकलनातील चांगल्या वापरण्याजोग्या कपड्यांचे गरजूंपर्यंत वितरण केले जाईल तसेच वापरता न येतील अश्या कपड्यांच्या स्वानंद व पुर्णम च्या माध्यमातून कापडी पिशव्या बनवल्या जातील.
आजच्या अभियानाचे अजून एक विशेष म्हणजे केवळ सोसायटीमधील नागरिकांचे प्रबोधन हा विषय न ठेवता परिसरातील भाजी विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांना प्लास्टिक चे होणारे दुष्परिणाम सांगण्यात आहे आणि स्वानंद च्या माध्यमातून ७ रुपये अश्या माफक दरात कापडी पिशव्या भाजी विक्रेत्यांकडे ठेवण्यात आल्या. शिवाय सोसायटीमधील सफाई कर्मचारी (हाऊस किपींग) यांसाठी येत्या काळात प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेण्यात येईल असे ठरवण्यात आले.



स्वेच्छेने आणि हिरीरीने काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे, नागरिकांचे अभिनंदन, शिवाय परिसरातीलसर्व सोसायटी चे पदाधिकारी यांनी देखील या अभियानात सहभागी होऊन आपल्या आपल्या परीने योगदान दिले म्हणून त्यांचे देखील अभिनंदन करावे तेवढे कमी आणि पुढे देखील या समाजोपयोगी कार्यात असाच सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन.

खरंतर हि सुरुवात आहे... प्रवास मोठा आहे.. छोट्या छोट्या सवयीतून मोठे परिणाम दिसायला वेळ हा द्यायलाच हवा, प्रयत्न कमी नको पडू द्यायला. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे अशीच या पुढे आयोजकांची अपेक्षा असेल, शिवाय सोसायटी मध्ये स्वबळावर अशी केंद्रे चालवीत या कडे देखील लक्ष देण्यात यावे. फेकण्यासाठी प्लास्टिक हातात आले कि लगेच त्याची वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची सवय सर्वांनी स्वतःपासून सुरु करावी, मग घरातील इतर सदस्य आणि मग संपूर्ण सोसायटी असा प्रवास खूप काही दूर नाही.

भावी कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद .. !

सध्याची कार्यशील केंद्रे - 



सोसायटी 
संकलन दिवस १
संकलन दिवस २
संपर्क 
सुंदर संस्कृती १ ल्या सोमवारी ३ ऱ्या सोमवारी श्री सुबोध कर्णिक  - 91587 58580
मधुकोष १ ल्या सोमवारी ३ ऱ्या सोमवारी श्री करजगी काका   - 77988 32389
श्री प्रदीप साठे - 83800 87013
मियामी  १ ल्या सोमवारी ३ ऱ्या सोमवारी श्री अश्विन कुरुंभट्टे - 95525 37267
क्रॉस ओव्हर आणि सिरीन काऊंटी    १ ल्या सोमवारी ३ ऱ्या सोमवारी श्री
श्री गणेश कपडे धुलाई केंद्रावर
दर रविवारी, सकाळी १० ते १२
श्री चेतन घोडके - 98500 00014


सेवा हैं यज्ञ कुंड, समिधा सम हम जलें || 

छायाचित्रे ..

वस्तीमधले कायमस्वरूपी संकलन केंद्र






मधुकोष  
सुंदर संस्कृती सोसायटी

वसंत विहार  
मधुकोष 

मधुकोष

मधुकोष

मधुकोष

मियामी सोसायटी, राजयोग रस्ता, लगडमळा...  

सुंदर संस्कृती 

मियामी 

सुंदर संस्कृती 








Wednesday, February 1, 2017

प्लास्टिक व ई-कचरा संकलन प्रकल्प राजयोग वस्ती

सिंहगड रस्ता राजयोग वस्ती (मधुकोष, राजयोग, अर्काडिया, वसंत विहार, मियामी, लगड मळा, सिंहगड दर्शन, सीरीन काऊंटी, क्रॉस ओव्हर काऊंटी, सुंदर संस्कृती या सर्व रहिवाशी संस्था) मधील प्लास्टिक -कचरा संकलन प्रकल्प. 

सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !!💐💐💐
गेल्या एक ते दोन महिन्यांपासून प्लास्टिक व ई-कचरा या विषयात २ ते ३ बैठका घेऊन सर्व सोसायटीतील कमेटी मेंबर आणि स्वयंसेवक (volunteers) यांना एकत्र करून ह्या विषयी जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात आपल्या भागातील १० सोसायटीतील २३ पदाधिकारी  प्रत्यक्ष संपर्क, ३ पर्यावरण विषयातील तज्ञ आणि ९ स्वयंसेवक (volunteers) चा प्रत्यक्ष  सहभाग स्वानंदचे स्वयंसेवक १० असे एकूण ४५ नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला, तसेच या अभियानाचे दरम्यान काही सोसायटीतील हाऊस किपींग (स्वच्छता ) रचना बघीतली गेली आणि  प्रत्यक्ष तेथिल कर्मचार्यांच्या आणि  सोसायटीतील नागरिकांच्या समस्या या अभियानात ऐकण्यात आल्या, निश्चितच हे मोठे आव्हान आहे आपल्या भागात साधारण ४,००० सदनिका म्हणजे जवळपास १०,००० नागरिक आहेत आणि दररोज प्रचंड प्रमाणात ओला, सुका कचरा , प्लास्टिक व ई- कचरा वाढत आहे, त्यामुळे आपली सर्वांची जवाबदारी वाढली आहे. २२ जानेवारी ला जमा झालेला साधारण ३०० किलो कचरा (प्लास्टिक व ई कचरा) ही एक उत्तम सुरूवात म्हणायला हवी, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि निश्चितच आपण सर्वजण मिळुन हे काम करू शकतो तसेच *रूद्र ईनव्हारमेन्ट* फेब्रूवारीच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी प्लास्टिक कचरा संकलन करेल, कृपया श्री करजगी काका, राहणार मधुकोष सर्वांना संपर्क करतील. 


पुढील आढावा बैठक *श्री प्रदीप साठे, राहणार मधुकोष, (वस्ती समन्वयक)* ठरवतील आणि चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवूयात. 

धन्यवाद 

टीप: आपल्या वस्ती मधील कायमस्वरूपी ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन केद्र सुरू झाले आहे, स्थान - श्री गणेश लाॅंड्री, वसंतविहार सोसायटी *दर रविवार वेळ १० ते १२*. 

Friday, November 18, 2016

तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास संस्थेत मधुकोष मिलनाचा सेवा सहभाग

तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास संस्थेत मधुकोष मिलनाचा सेवा सहभाग


विद्या विवादाय धनं मदाय
खलस्य शक्तिः परिपीडनाय ।
साधोस्तुसर्वम विपरीतमेतत्
ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥ 

ह्या उक्तीला सार्थ करत रविवारी दिनांक १३ नोव्हेंम्बर २०१६ रोजी मधुकोष आयटी मिलन तसेच मधुकोष सोसायटी आणि परिसरातील अन्य रहिवासी सोसायटींनी वेल्हे (तोरणा किल्ला पायथा) येथील "तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास" या संस्थेत सेवादानात सहभागी झाले. 

न्यासाची माहिती 
सन १९८६ साली अतिशय छोट्या स्वरूपात स्थापना झालेल्या या वसतिगृहात सध्या आजूबाजूच्या सर्व दुर्गम अश्या गावांमधून आलेले ५० मुले  विद्यार्थी इथे राहून शिक्षण घेतात. आतापर्यंत १००० मुले इथे शिकून बाहेर पडली आहेत, बरेच जण समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आहेत जसे काही जण सरपंच, पोलीस, मोठ्या कंपनी मध्ये नौकरी करत आहेत. गावी जाताना आवर्जून न्यासाच्या वसतिगृहात भेट देत जिथे आपण घडलो त्या जुन्या आठवणी ताज्या करतात तसेच जमेल तशी मदत देखील करतात, न्यासाने ठरवले आहे कि शासकीय मदतिशिवाय आपण समाजाच्या मदतीनेच ह्या प्रकल्पाची उभारणी करावी आणि ह्याच उद्देशाला मदत म्हणून सोसायटी ने हा उपक्रम राबवला आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व नागरिकांनी दिला.
       श्री आंबेकर हे वसतिगृहाचे पालक म्हणून १६ वर्षांपासून पूर्णवेळ काम पाहतात, त्यांनी वसतिगृहाची संपूर्ण माहिती अतिशय छान रीतीने दिली. न्यासाची काम करण्याची चतुःसूत्री हिच त्याच्या वाढीची आणि समाजाकडून स्वागताची व सहभागाची पायाभरणी आहे, हि चतुःसूत्री समजावून घेतानाच लक्षात आले कि न्यासाने दुर्गम भागातील मुलांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपवून परतत असलेल्या मुलांमधील तिथे वावरताना दिसत असलेला आत्मविश्वास हेच सर्व काही सांगून जातो.
दूर दूर असलेल्या अनेक गावातील मुलांकडे बघून त्यांना अत्यंत आवश्यक असलेल्या शिक्षणाची गरज समजावून घेताना न्यासाने वसतीगृहाचा विस्तार करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे आणि येत्या १७ जानेवारी २०१७ रोजी नवीन १५० मुलांच्या निवासाची  सोय होईल अश्या इमारतीचे भूमी पूजन करण्यात येईल

न्यासाची काम करण्याची चतुःसूत्री: 
शिक्षण - दुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षणाचे कवाडं उघडे करणे आणि समाजामध्ये त्यांच्या मार्फत जागृती करणे.
आरोग्य - वसतिगृहातील मुलांचे आरोग्य तसेच निरोगी समाजनिर्माणासाठी वनवासी कल्याण आश्रम च्या माध्यमातून गावोगावी आरोग्य रक्षकांची प्रशिक्षणासह नियुक्ती करणे.
ग्राम विकास - वेल्हे या गावाच्या सहभागाशिवाय न्यासाची वाढ आणि गावाची प्रगती शक्य नाही हे लक्षात घेऊन गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम, उपाययोजना, प्रशिक्षण, रोजगार संधी व प्रशिक्षण यांचे आयोजन करणे.
ग्राम संरक्षण - वेल्हे या गावाच्या नागरिकांमध्ये जागृती घडवून आणणे आणि त्यासाठी विविध कार्यक्रमांची रचना करणे. यातूनच दर वर्षी रथसप्तमी च्या मुहूर्तावर वेल्ह्यात तोरणा महोत्सव साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला आजूबाजूच्या सर्व गावातून नागरिक सहभागी होतात. 

आपल्या सेवा सहभागाच्या उपक्रमाची माहिती:
श्री. आंबेकरांकडून वसतिगृहातील मुलासाठी येणाऱ्या थंडीला तोंड देण्यासाठी म्हणून मुलामुलींसाठी १२१ स्वेटर्स ची मागणी करण्यात आली आणि कामाला सुरुवात झाली, आणि मग असे ठरले कि केवळ स्वेटर्स न देता न्यासाला काही वस्तूंची आवश्यकता असल्यास ती देखील पूर्ण करूया आणि अशानेच बघता बघता वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीच्या स्वरूपात येणाऱ्या साहाय्याची जणू रीघच लागली.
त्यातूनच मग अश्या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आणि सर्व रहिवाश्यांच्या सहभागासाठी CSR@Madhukosh (Citizens' Social Responsibility @ Madhukosh) म्हणून एक Whatsapp गृप पण बनवला आणि उत्साही रहिवाशी नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग दिला. काही काहींनी तर थेट परदेशातून मदत पाठवली आणि १३ तारखेला मधुकोष आणि परिसरातील अन्य रहिवाशी संस्थांमधील मिळून ३२ जण सहकुटुंब न्यासाच्या ठिकाणी गेलो


वेल्ह्याचा आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांशी असलेले चांगले संबंध आणि शेतकरी ते ग्राहक यांची थेट भेट घडवून आणावी म्हणून आंबेकरांशी चर्चा देखील करण्यात आली आणि सोसायटीतर्फे अश्या प्रकारे शेतकऱ्यांना थेट मदत जर कुठल्याही स्वरूपात करता आली तर ती करण्याचे देखील ठरवले. 



सेवा कार्यक्रमाचे सर्व फोटो येथे देत आहे - https://plus.google.com/117783181642492979614/posts/UXjkkJCRqhZ








सर्वांच्या माहितीसाठी म्हणून खाली सामानाची यादी देत आहे -

सामान  मात्रा
मिरची पावडर  ५ किलो
कांदा  लसुन मसाला  ७ किलो
धणे पावडर  ५ किलो
गोडा मसाला  ५ किलो
हळद  ५ किलो
शेंगादाणे २५ किलो
ज्वारी २०० किलो
कांदे १०० किलो
मटकी   ५ किलो
मुग   ७ किलो
वाटाणा  ५ किलो
राजमा  ५ किलो
जिरे   ५ किलो
मोहरी  ५ किलो
कपड्याचे साबण २०० 
आंघोळीचे  साबण २०० 
गुड नाईट लिक्विड -  १०
फ़ुटबाँल
बुध्दिबळ
 रिंग
क्रिकेट चे साहित्य 
बॅडमिंटन चे साहित्य 
टेनिस चे साहित्य 
*बारावी वाणिज्य  ची पुस्तक*
पेन ७०
तृतिय वर्ष वाणिज्य  ची पुस्तक 
वह्या २१५
*मुलांचे स्वेटर*  ५०
 *मुलींचे स्वेटर* ७१